मंगळवेढा, दि.२८ : स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी सतत वाचन केले पाहिजे. दहावीपर्यंत आपण खूप वाचतो परंतु नंतर वाचायचे विसरून जातो हे हे चुकीचे असून आपल्या उज्वल भविष्यासाठी वाचाल तरच वाचाल हा ज्ञानमंत्र प्रत्येकाने आत्मसात केला पाहिजे असे असे प्रतिपादन माध्यमिक आश्रम प्रशाला, कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बालाजीनगरचे प्राचार्य गणपती पवार यांनी व्यक्त केले.
बालाजीनगर (ता.मंगळवेढा) येथे शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील अकरावी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्राथमिक आश्रम शाळा बालाजीनगरचे मुख्याध्यापक विलास पवार, पोमा रजपूत, पालक सुनील खिलारे, श्री.भरमगोंडे आदी मान्यवर उपस्थित होते. अकरावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आला.
प्राचार्य गणपती पवार पुढे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे यशाचा राजमार्ग आहे. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून अभ्यास केला तर निश्चितच आपण यश संपादन करू शकता. अलीकडे मुले वाचण्यापेक्षा मोबाईल पाहण्याकडे जास्त लक्ष देतात त्यामुळे ती वाचनापासून दुरावत चालली आहेत परंतु आता असे करून चालणार नाही आपल्या उज्वल भविष्यासाठी वाचन हेच गरजेचे आहे. शासकीय धोरणानुसार परीक्षा आता कॉफी मुक्त वातावरणात पार पडत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी गाफील न राहता अभ्यासाची संगत करावी. शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात जीवन जगत असताना काही ना काही शिकले पाहिजे. श्री बालाजी शिक्षण मंडळाची आदर्शवत शिक्षण देण्याची परंपरा असल्याने येथील विद्यार्थ्याना शैक्षणिक बाबतीत येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथील ज्येष्ठ शिक्षक प्रा.पुंडलिक पवार यांनीही आपले विचार व्यक्त केले.
अकरावी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. मल्लेशा आरकेरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ कला विज्ञान महाविद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.









