मंगळवेढा, दि. 6 : तब्बल साडे तीनशे वर्षाच्या परकीय राजवटीच्या गुलामगिरीचे बंधन झुगारुन लावून महाराष्ट्राच्या गिरी शिखरावर स्वराज्याचे तोरण 6 जून 1674 रोजी उभारले गेले. संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी माणसासाठी अभिमानास्पद असलेला हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा मरवडे येथे उत्साहात साजरा करण्यात आला.
मरवडे येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी छत्रपती परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मरवडे येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास नूतन मुख्याधिकारी समाधान मासाळ तसेच उपअभियंता शैलेश पवार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी धार्मिक विधीचे संचलन पाडुरंग कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर या दोघाचाही निवडी बद्दल तसेच मेजर संभाजी पवार यांचा सेवापूर्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला.
यावेळी मंत्रोच्चार, जयघोष, हलग्याचा कडकडाट तसेच फटाक्याच्या आतषबाजीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी गावातील मुख्य मार्गावरुन निघालेल्या या फेरीची सांगता सहाय्यक कामगार आयुक्त दत्तात्रय पवार व शिवप्रेमी युवा कार्यकर्ते सावता दत्तू यांच्या हस्ते छत्रपती संभाजीराजे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.
यावेळी छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांनी प्रास्ताविकातून शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्व विशद केले. यावेळी उद्योजक हणमंत दुधाळ, माजी सरपंच अशोक पवार, माजी सरपंच महादेव मासाळ, गोविंद मासाळ, सिद्धेश्वर रोगे, युवराज सुर्यवंशी, संदीप पवार, भिमराज प्रतिष्ठानचे सुनील शिंदे, शंभूराजे प्रतिष्ठानचे सौरभ रोगे, दत्तात्रय मासाळ, वैभव पवार यांच्यासह गावातील विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावातील शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.