मरवडे फेस्टीव्हल गेली पंचवीस वर्षे सुरु आहे हे खरंच खूप अभिमानास्पद व कौतुकास्पद : प्रा. इंद्रजीत भालेराव

मरवडेत शाळा व शिक्षकांचा गौरव : प्रा. इंद्रजीत भालेराव यांनी सांगितले आदर्श शिक्षिकांचे गुण

श्रीकांत मेलगे – ब्युरो चीफ, झेप संवाद न्यूज 

मरवडे, दि.२१ : एक कार्यक्रम तोही एक दिवसाचा घ्यायचा म्हटलं की किती अपार मेहनत घ्यावी लागते हे मला ठाऊक आहे. मरवडे सारख्या ग्रामीण भागात पाच दिवस चालणारा मरवडे फेस्टीव्हल गेली पंचवीस वर्षे सुरु आहे हे खरंच खूप अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी केले.

ते मरवडे(ता.मंगळवेढा) येथे छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे हे होते. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक सुरेश कुलकर्णी, सहायक कामगार आयुक्त दत्तात्रय पवार, शिक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत, कवी इंद्रजीत घुले, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त प्राचार्य भारत घुले, रयत सेवक बँकेचे माजी अध्यक्ष साहेबराव पवार, गटशिक्षणाधिकारी डॉ. बिभीषण रणदिवे, विस्तारधिकारी पी.जी.राठोड, अनिल बंडगर, विकास उकीरडे, डॉ. रंगनाथ काकडे, अमोघसिद्ध कोळी, स्व.आप्पा खंडू भगरे सामाजिक ट्रस्टच्या अध्यक्षा प्रा.वनमाला भगरे, शिक्षक संघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सरस्वती भालके, शिक्षक समिती महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती कलुबर्मे, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. आपण झेप संवाद न्यूज या वेब पोर्टलवर सदरची बातमी वाचत आहात. यावेळी भव्य अशा कलाप्रदर्शनातील सहभागी स्वच्छंदी आर्टचे राजू रायबान, अक्षरमित्र अमित भोरकडे, राहुल लोंढे, जुन्या दुर्मिळ वस्तूचे संग्राहक राजेश गायकवाड, शिवकालीन वस्तूचे संग्राहक शेकाप्पा गाजुल, राजेंद्र अनवते यांचा विशेष सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

शिक्षक हे सगळे आदर्शच असतात त्यातून निवडून आपण पुरस्कार देत असतो. शिक्षकांत काय गुण असले पाहिजे हे नमूद करताना प्रा.भालेराव पुढे म्हणाले की, समाजातील सापेक्षता वाढली असताना शिक्षकांनी मात्र आपण वर्गात निरपेक्ष असले पाहिजे. आपण जे प्रकरण शिकवू तेच फक्त आपल्या डोक्यात असले पाहिजे. आयुष्यात एकही तास बुडविला नाही पाहिजे. बाहेर आपण कोणीही असो परंतू शाळेत शिक्षण देणे हा कर्तव्याचा भाग आहे हे ध्यानी घ्यावी. विद्यार्थ्यांनी आपणास न विसरणे यासारखे मोठे पारितोषिक नाही असे सांगत असताना मोबाईलचे जग बिघडले असे आपण म्हणत असलो तरी मोबाईलचा वापर चांगल्यासाठी केल्यास आपली निश्चितच प्रगती होते. यावेळी त्यांनी काही कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, आज मरवडे फेस्टिव्हलच्या माध्यमातून शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. आपण जरी वेगळ्या क्षेत्रात काम करीत असलो तरी मलाही शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. कुठेही आपणास शिकविणारे शिक्षक भेटले तरी त्यांचा आदर करा तरच भविष्यात तुमचाही आदर होईल. लहान – लहान कामे केली तरच त्यातून आपणास मोठेपणा प्राप्त होतो. यावेळी सहायक कामगार आयुक्त दत्तात्रय पवार, सेवानिवृत्त शिक्षण सहसंचालक सुरेश कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील शाळा व शिक्षकांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पहार देऊन गौरवण्यात आले. तसेच गेली २५ वर्षे मरवडे फेस्टिव्हलच्या माध्यमातून चांगुलपणाचा चळवळ उभारणारे छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार यांचा सत्कार धनश्री परिवाराच्यावतीने करण्यात आला.

छत्रपती परिवाराच्या वतीने आयोजित शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रास्ताविक करताना संयोजक सुरेश पवार म्हणाले की, गेली २३ वर्षे स्व. आप्पासाहेब खंडू भगरे सामाजिक ट्रस्टच्या सौजन्याने हा शैक्षणिक पुरस्कार प्रदान सोहळा सुरू आहे. मरवडे फेस्टिव्हलच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सुरू आहेत. गेली ३२ वर्षे समाजातील सर्वच क्षेत्रात काम सुरू आहे. शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक साहित्य क्षेत्रात काम करत असताना सामुदायिक विवाह सोहळा, कोरोना काळात जीवनावश्यक साहित्याचे वाटप, लेकीचे झाड, आशा वर्कर यांना मदत देण्याचे काम अशी अनेक समाजोपयोगी कामे छत्रपती परिवाराच्या माध्यमातून केली जात आहेत.

सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार प्रा. शशिकांत घाडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिद्धेश्वर रोंगे, विजय पवार, दत्तात्रय मासाळ, सचिन कुलकर्णी, प्रवीण गुंड, बंडू पवार, प्रा. राजेश कुलकर्णी, प्रा.श्रीकांत लवटे, अरुण सरडे, प्रा.महावीर कांबळे, अवधूत क्षीरसागर, चंद्रकांत पवार, रावसाहेब जाधव यांच्यासह छत्रपती परिवाराच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here